आर्थिक दृष्ट्या समृद्ध असणारे समाजातील काही दानशूर लोक एकत्र येऊन गोरगरीब, झोपडीत राहणाऱ्या अत्यंत गरीब असलेल्या लोकांसाठी, त्यांच्या शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी मदतीचा हात देण्यासाठी पुढे येत असतात. अनेक संस्था सामाजिक कार्यात कार्यरत असल्याचे दिसते. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, ते ऋण अंशतः का होईना आपण फेडण्याचा प्रयत्न करायला हवा अशा कृतज्ञ भावनेने या संस्था सतत प्रयत्नशील असतात. अशाच प्रकारे वंचितांसाठी, तळागाळातल्या सामान्य कुटुंबाना सहयोग देण्याचे काम अलीकडे आपुलकी प्रतिष्ठान करत आहे.
पत्रकार राजेंद्र यादव सरांच्या कल्पकतेतून आपुलकी प्रतिष्ठानची निर्मिती झाली. अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना त्यांनी कृतज्ञतेची जाणीव असलेली समविचारी सहकारी मंडळी प्रतिष्ठानमध्ये सामावून घेतली. सचिव पदाची धुरा संतोष महिमकर यशस्वीपणे सांभाळत आहेत. दीपक चोथे, हरिभाऊ जगताप गुरुजी, अरविंद केदार, रमेशअण्णा देशपांडे, अरविंद डोंबे गुरुजी, सुभाष लऊळकर सर आणि इतर सर्व दातृत्व अंगी असणारी मंडळी यामध्ये आपुलकीने काम करताना दिसतात. वास्तविक ही मंडळी आर्थिक दृष्ट्या समृद्ध आहेत असे मात्र नाही. जेमतेम परिस्थितीतीलच सर्वजण आहेत. सचिव पद भुषवणारे म्हणण्यापेक्षा यशस्वीपणे सांभाळणारे, त्या पदाला खरोखर न्याय देणारे संतोष महिमकर तर अगदी सामान्य कुटुंबातील आहेत. मात्र या सर्वांमध्ये परोपकारी वृत्तीचा गुण अंगामध्ये मुरलेला आहे. म्हणूनच त्यांच्या हातून लोकसेवेचे सत्कार्य होताना दिसते.
धान्य वाटप, कपडे वाटप, विद्यार्थ्यांसाठी सायकल, निराधार विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी उचलणे, गोरगरिबांना उदरनिर्वाहसाठी आधार म्हणून शेळीसारखे (गरीबाची गाय) पशु वाटप करणे, दीपावली सारख्या सणाच्या प्रसंगी दिवाळी फराळ वाटप करणे, गंभीर आजारी असणाऱ्यांसाठी आर्थिक मदत करणे, थंडीच्या दिवसात थंडीपासून संरक्षण होण्यासाठी ब्लॅंकेट -लोकरीचे कपडे वाटप करणे, उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके बसू नयेत म्हणून चप्पल -बूट देणे, उपासमार होत असलेल्यांसाठी धान्य पुरविणे, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी महागडी पुस्तके पुरविणे अशा अनेक प्रकारची सेवा करताना ही सर्व मंडळी दिसतात. सामान्य परिस्थितीतूनच आलेली ही सर्व मान्यवर मंडळी सामान्यांचाच आधार म्हणून त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. खऱ्याखुऱ्या अर्थाने वंचित असलेल्याचा शोध हे सर्व लोक अचूकपणे घेत आहेत. आपल्या मागील परिस्थितीचे सिंहावलोकन करून आपल्यासारखे हाल या गरिबांचे होऊ नयेत या उदात्त हेतूने हे सर्वजण झोकून देऊन कार्य करत आहेत. वरचेवर या कार्याची महती म्हणण्यापेक्षा व्याप्ती अधिकाधिक वाढत चालल्याचे दिसून येते. वंचित शोधून मदत करत असताना या दात्यांचे संचित निश्चितपणाने वाढणार आहे, यात शंकाच नाही. लाभधारक सर्वजण खराखुरा दुवा देत राहणार आहेत. या आशीर्वादावरच पुढील व्याप्ती आणखी भरारी घेणार आहे. ही गरुडभरारी आकाशाकडे झेप घेत राहणार आहे. मा. यादव सरांनी लावलेले सत्कार्याचे वटवृक्षरुपी रोपटे फोफावत चालले आहे. याच्या फांद्या विस्तारत आहेत. पारंब्या जमिनीत आसरा शोधत आहेत. त्यामुळे वृक्षाची बळकटी अधिकच वाढणार आहे. महाकाय वटवृक्ष होण्यास त्यामुळे वेळ लागणार नाही. एका विचाराने भारावलेली, ध्येयाने झपाटलेली ही उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्या कर्तृत्वाचा ठसा जनमानसात खरंतर आसमंतात पोहोचविल्याशिवाय राहणार नाहीत, असा ठाम विश्वास वाटतो. सांगोला शहराचा विस्तार अलीकडे वीस वर्षाच्या कालावधीत आश्चर्यकारक असा झालेला दिसतो. रत्नागिरी नागपूर या हायवे वरील सांगोला हे प्रमुख शहर असल्याने मेडिकल कॉलेज सोडून शिक्षणाची सर्व सोय सांगोल्यात झाली आहे. औद्योगिक क्षेत्रातील भरारीही वाखाणण्याजोगी झाली आहे. तात्पर्य हेच की यामुळे सांगोला शहर चारी दिशेला झपाट्याने वाढत आहे. दहा-बारा किलोमीटर परिसर सांगोला शहराने व्यापलेला दिसतो. स्मशानभूमी पासून दूर अंतर असलेल्या भागात जर एखादी दुःखद घटना घडली तर अंत्यविधी साठी स्मशानभूमीकडे जाण्यासाठी टेम्पो सारख्या वाहनांचा आधार घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. तेही वाहन आयत्यावेळी मिळत नसे. मिळाले तर वाहनचालक अव्वाच्या सव्वा पैसे मागत. ही परिस्थिती या मंडळींच्या चाणाक्ष नजरेतून सुटली नाही. म्हणूनच आपुलकी प्रतिष्ठानने नाममात्र शुल्क ठेऊन मोक्षरथ उपलब्ध करून दिला. हा दूरदृष्टीपणा मानावाच लागेल. शहरातच नव्हे तर हा मोक्षरथ खेड्यापाड्यात सुद्धा पोहोचू लागला आहे. केवढे हे पुण्याईचे काम! आयुष्यभर हाल अपेष्टा सहन करून मृत्यू आला तर मृत्यूनंतरही हाल होऊ नयेत यासाठी ही लाखमोलाची सोय केली आहे. यामुळे दिवंगतांना मोक्ष मिळायला काही हरकत नाही.
स्वतःसाठी सर्वजण जगत असतात. मात्र आपण जगत असताना इतरांनाही जगण्यासाठी आधार देणारे फारच थोडे असतात. या थोड्यामध्ये आपुलकी प्रतिष्ठानची मंडळी समाविष्ट आहे. यांच्या कार्याची व्याप्ती यशस्वीपणे वाढण्यासाठी या मंडळींना आरोग्यासहित दीर्घायुष्य लाभावे आणि वंचितांना अधिकाधिक फायदा होत जावा यासाठी शिवचरणी नम्र प्रार्थना! पुढील यशस्वी भरारीसाठी पुन्हा एकदा आभाळभर शुभेच्छा!
- *श्री.सिद्धेश्वर गुंडाप्पा झडबुके गुरुजी*
( मेडशिंगीकर) नाझरे, ता. सांगोला.
मो. ९९७५०३१०६५
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा