Breaking News

१६ फेब्रुवारी २०२४

महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्यांदाच "जागर सौभाग्याचा" हा अनोखा उपक्रम डॉक्टर लक्ष्मण आसबे यांच्या प्रयत्नातून इंदापूरमध्ये घेण्यात आला..


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

 इंदापूर :-  "जागर सौभाग्याचा" हा कार्यक्रम कामधेनू सेवा परिवार, जिजाऊ फेडरेशन, पतंजली योग परिवार ,शिवभक्त परिवार, बोंद्रे डेव्हलपर्स ,लिनेन्स क्लब, सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट,इंदापूर महिला भजनी मंडळ, अंगणवाडी सेविका समिती, मैत्रीण ग्रुप, महिला बचत गट, ब्रह्मचैतन्य संकुल ,स्वामी समर्थ ट्रस्ट, राजमाता ग्रुप ,साई महिला स्वयंरोजगार संस्था व देविका बहुउद्देशीय संस्था संत निरंकारी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा अनोखा उपक्रम गुरुवार दिनांक 15/ 2/ 2024 रोजी  सिद्धेश्वर मंदिर इंदापूर येथे आयोजित करण्यात आला होता . 

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वीर पत्नी  सुरेखाताई जाधव त्याचबरोबर सर्व पक्षीय महिला पदाधिकारी आवर्जून उपस्थित होत्या.

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्यादेवी होळकर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते व  दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली . 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला पतंजली योग समितीच्या तहसील प्रभारी मायाताई विंचू यांनी केले व मनोगत सुरेखाताई ननवरे यांनी केले. पती गेल्यानंतर अकरा वर्षापासून ची कशाप्रकारे वाटचाल केली . समाजाच्या टीकेला कश्या त्या सामोरे गेल्या याबाबतच्या व्यथा त्यांनी आपल्या मनोगता मधून मांडल्या. 

यावेळी उपस्थित माता-भगिनी हे ऐकून भावनिक झाल्या. याप्रसंगी डॉ लक्ष्मणराव आसबे म्हणाले ,की  भारतीय संस्कृतीमध्ये पौष महिना हा सुवासिनींच्या उत्साहाचा महिना समजला जातो. या महिन्यांमध्ये सौभाग्यवती असणाऱ्या स्त्रिया अनेक ठिकाणी हळदीकुंकवाचा कार्यक्रम आयोजित करीत असतात. हा महिना जसा सुवासिनींच्या आनंद उत्सवाचा महिना समजला जातो तसाच तो आमच्या दृष्टीने ज्यांचे अल्पवयात किंवा दुर्दैवी घटनेमुळे पती गेलेले आहेत अशा बहिणींसाठी हा महिना दुःखाचा अनुभव देऊन जात असतो .धर्मग्रंथांमध्ये पतीचे निधन झाल्यानंतर त्याच्या पत्नीला वेगळी वागणूक व सौभाग्य अलंकार काढून टाकण्याचा उल्लेख कोठेही केलेला नाही. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मशास्त्राचे काही नियम बदलून राष्ट्रहितासाठी व समाज हितासाठी काही ऐतिहासिक निर्णय घेतले होते . त्यामुळेच एक वेगळा इतिहास घडला गेला. तसेच समाजामध्ये वावरत असताना या विधवा भगिनींना पुरुषाकडून जास्त त्रास कधी होत नाही. परंतु अवतीभवतीच्या महिला याच आपल्या बोलण्यामधून अशा भगिनींना नाहक त्रास देतात. याबाबत जनजागृती होण्यासाठी समाजाने अशा माता भगिनींना सन्मानपूर्वक वागणूक देण्यात यावी व अशा स्त्रियांच्या जीवनातून विधवा हा या शब्दाला कायमची तिलांजली देण्यासाठी सामाजिक आणि शासकीय स्तरावर एकत्रितपणे प्रयत्न करण्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे .याप्रसंगी उपस्थित सर्व माता-भगिनींनी हात उंच करून शासकीय स्तरावर ती पाठ पाठपुरावा करण्यासाठी तीन ठराव मांडण्यात आले. (1)इथून पुढे विवाहित पुरुष गेल्यास त्याच्या पत्नीचे कुंकू पुसू नये व सौभाग्य अलंकार काढू नयेत असा कायदा करावा.

 (2) याबाबतचा कोणी कायदा मोडल्यास त्याच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी.

 (3)लग्नापूर्वी कुमारी व लग्नानंतर पती हयात असो अथवा नसो मरेपर्यंत सौभाग्यवती असाच उल्लेख शासकीय दप्तरांमधून यापुढे उल्लेख करण्यात यावा. हे तिन्ही ठराव उपस्थित सर्व माता भगिनींनी टाळ्याच्या गजरामध्ये शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी संमत केले . या कार्यक्रमासाठी 1500  महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. उपस्थित सर्व भगिनींना जिजाऊ फेडरेशनच्या माध्यमातून चुडा व बांगड्यांचे वाण वाटप करण्यात आले. कार्यक्रम स्थळाची बैठक व साऊंड सिस्टिम व्यवस्था निर्मलाताई मखरे यांनी केली. याप्रसंगी उपस्थित पत्रकार बांधव यांचा पण सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व सेवाभावी संस्थेने  विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सुनिता गलांडे यांनी केले तर आभार  राजश्रीताई शिंदे यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा