Breaking News

०३ ऑक्टोबर २०२३

वालचंदनगर येथे महार रेजिमेंट स्थापनेचा ८३वा वर्धापनदिन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतु अमनदादा आंबेडकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा !







 विशेष प्रतिनिधी -  संतोष कदम. 

वालचंदनगर :- ‌( ता. इंदापूर ) भारतीय लष्करातील महत्वाचे सैन्यदल अशी महार रेजिमेंट ची ओळख आहे. या रेजिमेंटची १ आँक्टोबर १९४१ मध्ये बेळगाव येथे स्थापना  झाली. महार रेजिमेंटच्या शौर्याच्या गाथा ह्या जागतिक पातळीवरच्या आहेत. राजा-महाराजांच्या काळातही महार समाजातील सैन्य हे अतिशय कणखर आणि शौर्य वान असल्याच्या नोंदी आहेत. मेजर वॉडबी हा महार सैनिकांचा अधिकारी होता. त्यानंतर जनरल के. व्ही. कृष्णराव हे महार रजिमेंटचे पहिले जनरल होते व ते जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल देखील होते.

 दुसऱ्या महायुद्धात  महार सैनिकांनी मोठी कामगिरी केली. महार रेजिमेंटच्या सैनिकांनी युध्दकाळात आणि शांती काळात आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे जगभरात कीर्ती मिळविली आहे .


 महार रेजिमेंटने ९ युध्दक्षेत्र सन्मान आणि १२ रणक्षेत्र सन्मान मिळविले आहेत.  तसेच १ परम वीर चक्र, १ अशोक चक्र, ९ परम विशिष्ट सेना पदक, ४ महावीरचक्र, ४ कीर्तीचक्र, १ पद्मश्री, ३ उत्तम युध्द सेवा पदक, १६ अतिविशिष्ट सेवा पदक, ३० वीरचक्र, ३९ शौर्य चक्र पदक, २२० सेना मेडल आणि बरेच इतर पुरस्कार मिळविलेले आहेत. याशिवाय महार रेजिमेंटने २ चिफ ऑफ आर्मी स्टाफ तसेच २ आर्मी कमांडर भारतीय सेनेला देण्याचा मान मिळविला आहे अशा या शूर महार  रेजिमेंटचा  ८३ वा वर्धापन दिन महाराष्ट्रातील अनेक भागात उत्साहात साजरा करण्यात आला.

 त्या अनुषंगाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान वालचंदनगर येथे दि . १ आँक्टोबर २०२३ रोजी महार रेजिमेंटचा ८३ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला. या वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन महार कुटीर यश सिद्धी सैनिक संघ , महाराष्ट्र राज्य यांनी केले होते.


या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू अमन दादा आंबेडकर  त्याचबरोबर बार्टी पुण्याचे विभाग प्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण सर, वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष राज कुमार उपस्थित होते.


 यावेळी अमन दादा आंबेडकर यांचे पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत करण्यात आले. महार रेजिमेंट मध्य प्रदेश सागर येथील पाईप बँड त्यांच्या स्वागतासाठी बोलवण्यात आला  होता.


यावेळी कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती  पुतळ्यास व महापुरुषांच्या प्रतिमांस अमन दादा आंबेडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीताने झाली.


यावेळी महार रेजिमेंटच्या आजी -माजी सैनिकांनी महार रेजिमेंटचा

ध्वज हाती घेऊन  डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते बाजारपेठ अशी रँली काढली . रॅलीमध्ये महार रेजिमेंटचा  विजय असो, भारत माता की जय, त्याचबरोबर सर्व महापुरुषांच्या घोषणा देण्यात आल्या.या महार रेजिमेंट जवान यांनी काढलेल्या भव्य रँलीत महिला, मुली,तसेच शहीद झालेले जवान यांचे माता,पिता,पत्नी यांनी देखील सहभाग घेतला. 


यावेळी महार रेजिमेंट सैनिकांनी अमन दादा आंबेडकर, डॉ. सत्येंद्रनाथ   चव्हाण सर, राज कुमार यांच्या  हस्ते देशासाठी शहीद झालेल्या वीर माता,वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला .  त्याचबरोबर आजी-माजी सैनिक यांच्याबरोबर शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान  करण्यात आला .


यावेळी उपस्थितांना अमन दादा आंबेडकर यांनी संबोधित केले. 1 ऑक्टोबर 1941 रोजी बाबासाहेबांनी बेळगाव या ठिकाणी महार रेजिमेंट ची स्थापना केली. महार रेजिमेंट देशातील अशी एकमेव रेजिमेंट आहे ज्यामध्ये देशातल्या सगळ्या भागातल्या वेगवेगळ्या समुदायातील सैनिकांचा समावेश आहे. रेजिमेंट चा इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच आहे. त्यांनी युद्धकाळात केलेल्या कामगिरीबद्दल माहिती करून दिली.


यावेळी बार्टी पुणे विभाग प्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण सर यांनी पूर्वीश्रमीचे  सन 1653 पासूनचे नागवंशीय  महार योद्धा व त्यांचे पराक्रम , स्वराज्यासाठी असणारे त्यांचे योगदान, महार रेजिमेंटचा गौरवशाली इतिहास व भीमा कोरेगाव च्या इतिहासाबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा पूर्व जिल्हा अध्यक्ष राजकुमार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.


या कार्यक्रमाला उपस्थितीत असणाऱ्या सर्व महार रेजिमेंट यशसिंध्दी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला . 

हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी महार रेजिमेंट च्या यशसिद्धी ग्रुपच्या कॅप्टन विजय लोंढे, सुभेदार महादेव माने, सुभेदार तानाजी मोरे, सुभेदार जालिंदर मोरे, सुभेदार अशोक धाईंजे, सुभेदार सुभाष सपकळ, हवालदार गौतम वीर, हवालदार गौतम भालेराव, हवालदार गौतम मिसाळ, हवालदार आर आर चव्हाण, हवालदार दत्तात्रय बनसोडे, हवालदार संजय साठे, हवालदार शामराव कांबळे, हवालदार सुनील ठोकळे, हवालदार श्रीकांत झेंडे यांनी मोलाचे योगदान दिले.


या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर आर आर चव्हाण यांनी व कार्यक्रमाचे प्रस्तावना आणि आभार सुभेदार महादेव माने यांनी केले.


 कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवर मंडळीसाठी भोजन दान ठेवण्यात आले होते. त्याचा आस्वाद घेत या अभूतपूर्व कार्यक्रमाचे सर्वजण साक्षीदार झाले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा