Breaking News

३१ मे २०२५

अजनाळे ग्रामपंचायतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी


 अजनाळे : 

अजनाळे ग्रामपंचायतीच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या  कार्याचा गौरव करत ग्रामस्थांनी एकत्र येत त्यांच्या विचारांचे स्मरण केले.

कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हे पूजन विद्यमान सरपंच सौ. अनिता पवार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी माजी सरपंच सौ. सुजाता देशमुख, ग्रामपंचायत सदस्या सौ. दिपाली लाडे, ग्रामपंचायत अधिकारी संदिप सरगर, पोलिस पाटील भंडगे, युवा नेते चंद्रकांत पवार, राणी पोतदार, योगेश देशमुख, महेश चव्हाण, महादेव भंडगे आणि अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी युवा कार्यकर्ते योगेश देशमुख यांनी आपल्या मनोगतातून अहिल्यादेवींच्या दूरदृष्टी, शासकीय कार्यपद्धती, आणि समाजहितासाठी केलेल्या कामांचे वर्णन करत तरुणांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “अहिल्यादेवींनी स्त्रीशक्तीचा आदर्श ठेवल्याने आज आपल्याला स्त्री नेतृत्वाच्या संधी मिळाल्या आहेत. त्यांचे योगदान विसरता येणार नाही.”

कार्यक्रमात सरपंच सौ. अनिता पवार यांनी देखील आपल्या मनोगतातून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला. त्या म्हणाल्या, “अहिल्यादेवींनी केवळ राज्यकारभारच नाही, तर धर्म, समाजसेवा आणि न्यायप्रविष्ट कार्यातही मोठे योगदान दिले. त्यांनी गरीब, शोषित, आणि उपेक्षित घटकांसाठी काम करून खऱ्या अर्थाने जनतेची राजमाता म्हणून लौकिक मिळवला.”

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामस्थांमध्ये एकतेचा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणाने ग्रामस्थांमध्ये नवचैतन्य संचारले. त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे अनुकरण करणे हीच खरी काळाची गरज आहे, असा सूर उपस्थित मान्यवरांच्या भाषणातून उमटला. अशा कार्यक्रमांमुळे इतिहासातील थोर व्यक्तिमत्त्वांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवले जात आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

“पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या आदर्श नेतृत्व आणि जनसेवेचा अनमोल प्रतीक आहेत. त्यांनी समाजहितासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. स्त्रीशक्ती, न्याय आणि धर्मनिरपेक्षतेचा त्यांनी दिलेला संदेश आजच्या पिढीने आत्मसात करण्याची गरज आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करताना आपणही समाजासाठी काहीतरी देण्याचा संकल्प करूया. अजनाळे ग्रामपंचायतीतून त्यांच्याच धर्तीवर लोकहिताचे उपक्रम राबवले जातील. अहिल्यादेवींच्या विचारांचा प्रकाश आपल्या कार्याला दिशा देतो.” 

 सरपंच सौ. अनिताताई पवार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा