Breaking News

०१ डिसेंबर २०२४

जनावरांच्या गोठ्याची स्वच्छता व निर्जंतुकीकरणावर प्रात्यक्षिकातून कृषिदूतांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित आणि महात्मा फुले कृषी विदयापीठ राहुरी संलग्न डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम व पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग अंतर्गत जनावरांचा गोठा स्वच्छ कसा ठेवावा ? काय काळजी घ्यावी ? याचे प्रात्यक्षिक कृषिदुतांनी शेतकऱ्यांना करून दाखविले. हा कार्यक्रम इंदापूर तालुक्यातील भगतवाडी येथे पार पडला.


यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांचे सहाय्य घेऊन व विविध अवजारे वापरून गोठ्याची स्वच्छता केली. खोऱ्याच्या साह्याने गाईचे शेण एका टोपलीमध्ये भरले. जमिनीवर पडलेल्या मलमूत्राची पाणी फवारणी यंत्राद्वारे स्वच्छता केली. यावेळी गोठ्यामध्ये असलेल्या गाईंची ही स्वच्छता करण्यात आली. यावेळी विविध औषधांचा वापर करण्यात आला.गोठ्यातील वातावरण जास्त वेळ ओलसर राहिल्यास, अशा ठिकाणी जिवाणू, विषाणू आणि परोपजीवींची वाढ मोठ्या प्रमाणात होत असते. परिणामी जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. हे सर्व टाळण्यासाठी गोठ्याचा परिसर स्वच्छ ठेवावा.  अश्या सुचना यावेळी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना दिल्या.


जनावरे सकाळी बाहेर सूर्यप्रकाशात बांधावीत. मलमूत्राची व्यवस्थित विल्हेवाट लावताना संपूर्ण गोठा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावा, असे केल्याने गोठ्यातील माशांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. गोठ्यात जनावरे बसण्याच्या जागेवरील सर्व खाचखळगे मुरूम टाकून व्यवस्थित भरून घ्यावेत. जनावरे बसण्यासाठी मॅटचा वापर करावा. गोठ्यातील अमोनिया बाहेर जाऊन हवा खेळती राहील, याकडे लक्ष द्यावे, असे मार्गदर्शन करण्यात आले.


गोठा स्वच्छतेचे प्रात्यक्षिक कृषिदुत प्रतिक थोरात, सुरज गुंजाळ, वैभव चौधरी, संकेत गव्हाणे, कृष्णा इळगार, अभिषेक ढोक, संम्यक वैद्य, सुजित शिंदे यांनी प्रात्यक्षिक सादर केले व शेतकऱ्यांना याचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.पी. गायकवाड, प्रा.एस. व्ही. बुरुंगळे यांचे व इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा